Friday, June 26, 2009
एक वळण अजून...
ती संवेदनाच होती अंगावर शहारे आणणारी...
देहाचा प्रत्येक कण जणू पेटून उठला!!
स्वतःच्या शरीराची जाणीव प्रचंड प्रखरतेने करून देणारी एक शिरशिरी...
उतरत गेली.. मणक्यांतून...
आणि मी बेफाम निघालो..
वाटा चुकवत, नजरा टाळत...
प्रत्येक क्षणावर लादलेलं युगायुगांच ओझं पेलत
पण हाय रे दैवा....
आज प्रत्येक लाल दिवा माझ्याकडेच वटारून बघतो आहे...
प्रत्येक खळगा आज माझ्याच गाडी खाली येतोय...
प्रत्येक गाडी आज एक रिक्षा बनून चालते आहे...
आज मी वेगात आहे की जग संथ झालंय??
रस्त्याच्या प्रत्येक हिंदोळ्यासोबत शरीराच्या रोमारोमात उठणारी आंदोलनं
निग्रहानं परतवित मी संयमाची पराकाष्ठा करतो आहे...
डोक्यावर तरंगत्या या तलवारीचा हलकासा स्पर्शही आत्मसन्मानाची होळी करणारा...
मन आणि शरीर यांच्या या अविरत द्वंद्वात मी प्राणांतिक धावतो आहे...
माझ्या ध्येयाकडे...
मनाला सतत बजावित...
या निसरड्या वाटेवर फक्त एक... फक्त एक वळण अजून...
**************************************************
(कविता वाचून विचार आला ना मनात - की ही कविता अशी कशी? तर मग जरा कल्पना करा की कालच्या पार्टीत झालेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून पोटाने बंड केलंय, तुम्ही शहराच्या मधे गर्दीत बाइक वर आहात... आणि घरी पोचून सगळ्या "शंकांच" निरसन व्हायला किमान अर्धा तास तरी अजून आहे.
- स्वानुभवावर आधारित....)
Sunday, June 14, 2009
तू आणि मी...
Sunday, March 22, 2009
थोडा आराम करून घेईन म्हणतो...
माझ्यापासून दूर कूस बदलणारी रात्र...
पहाटेच्या प्रकाशात थोडा प्राजक्त वेचून घेईन म्हणतो...
उद्या एक दिवस थोडा आराम करून घेईन म्हणतो...
पुन्हा तेच शब्द, पुन्हा तेच वाद
रंगविल्या चेहर्यावर पुन्हा तोच माज...
स्वतःचाही चेहरा आरशात पाहून घेईन म्हणतो
उद्या एक दिवस थोडा आराम करून घेईन म्हणतो...
अस्तित्वाच्या ओझ्याने जखडलेली मान
अन् आयुष्याच्या अंतराला दूरत्वाचे वाण
तुझ्या पदराआड थोडा निजून घेईन म्हणतो
उद्या एक दिवस थोडा आराम करून घेईन म्हणतो...
मध्यान्हिच्या ऊन्हात तळमळणारा प्राण
डोळ्यातून पाझरतेय जास्वंदाची तहान
अंगणात पुन्हा एक श्रावण शिंपून घेईन म्हणतो
उद्या एक दिवस थोडा आराम करून घेईन म्हणतो...
आयुष्यावर एक कविता करून घेईन म्हणतो...
व्याकुळल्या श्वासात आसमंत भरून घेईन म्हणतो...
पुन्हा एकदा थोडा जगून घेईन म्हणतो...
उद्या एक दिवस थोडा आराम करून घेईन म्हणतो...
Thursday, January 29, 2009
राजहंस एकटा
जागते रहोsss कुणीतरी अगदी जवळून ओरडलं अणि त्या पाठोपाठ एक तीव्र कर्णकर्कश्य शिटी आली. रात्रपाळीचा एक गुरखा समोरून जात होता. माझी समाधि भंगल्याचा राग मनात जन्म घेणार त्या अगोदरच विचार आला - एवढ्या सुंदर रात्री हा असा भुतासारखा फिरतोय, एकटा...
एकटा... या शब्दानं गेले कित्येक वर्षांपासून मला कोडयात टाकली. सातवी आठवीत असताना एक पुस्तक वाचलं होतं - "तो राजहंस एकटा". ते पुस्तक कुणाचं, त्याचा विषय, आशय काहीच लक्षात नाही पण ते पुस्तक लक्षात आहे ते त्याच्या नावमुळं - "तो राजहंस एकटा"! राजहंसाच्या अनेक कथा मी लहानपणापासून ऐकत आलोय पण नीरक्षिरविवेक लाभलेला एवढा दैवी पक्षी या शीर्षकात एकटाच का असावा? तेव्हापासून एकटा या शब्दानं माझा पिच्छा पुरवलाय आणि त्या चौकिदारानं आज पुन्हा जुन्याच प्रश्नांच मोहोळ मनात उठविलं...
एवढ्यात तो पुन्हा समोरून गेला. थंडीमुळे त्याची शिटी नुसतीच फुरफुरत होती. हिवाळ्यात तीही बिचारी त्याची साथ देत नाही. मला त्याच्या दुर्दैवाची कीव आली. झोपलेल्या माणसांना जागते रहो म्हणायचं करंटेपण त्याच्या कपाळी होतं. त्याचा तो पहाडी आवाज सावधातेची सूचना आहे की या एकटेपणात त्याने स्वतःलाच घातलेली साद? जणू तो स्वतःलाच ओरडून सांगतो आहे- जग झोपलं असलं तरी तुला जागायच आहे, जागं रहायचं आहे. त्याचा हा आवाज इतरांच्या कानापर्यंत पोचत असला तरी त्याच्या स्वतःच्या मनापर्यंत पोचत असेल का?
बाहेर अमर्याद आकाश पसरलय... प्राजक्ताचा सडा पडल्यासाराखी लुकलुकणार्र्यां तार्र्यांची रास आकाशात पसरालीय... जणू रात्रीच्या अन्धारावर निगराणी ठेवण्यासाठी विधात्यानं नेमलेले पहारेकरीच!! पण त्यातला प्रत्येक जण वेगळा... एकटा...
नाही म्हणायला वसिष्ठासारखेही तारे आहेत, त्यांच्या सोबत अरुन्धती आहे. पण इतर सर्व मात्र एकटे...सगळ्यांसोबत असुनही नसलेले... त्यांचा तो एकटेपणा माणसालाही रुचला नसावा आणि त्यातूनच मग नक्षत्रांचा जन्म झाला. तार्र्यांचे समूह करण्याची कल्पना ज्याच्या कुणाच्या मनात आली त्यालाच स्वतःच्या एकटेपणाची जाणीव सर्वप्रथम झाली असावी. तारे अगोदरच होते पण नक्षत्रे आलीत ती माणसाला त्याच्या एकटेपणाची खात्री पटल्यावारच!!! आपला एकटेपणा त्यांच्याही नशिबी येऊ नये म्हणुन माणसानं नक्षत्रांची योजना केली आणि तेव्हापासून वर्षानुवर्षे तारे गुण्यागोविंदाने नान्दताहेत - एकत्र!!
राजहंसाच्या एकटेपणानं मला बुचकळ्यात टाकलं होतं, त्याला एकटेपणाचा शाप का मिळावा? पण आज कळतय तो एकटा आहे म्हणूनच "राजहंस" आहे! एकटेपणात आपण स्वतःशीच बोलायला लागतो. एकटेपणा स्वतःसोबत गप्पा मारण्याची संधि देतो. राजहंसाही असाच स्वतःसोबत बोलत असावा आणि एक दिवस तो स्वतःचाच मित्र झाला असेल.... त्यानं स्वतःला ओळखलं असेल अणि इतरांच्या सोबतीची त्याला कधी गरजच भासली नसावी...
आकाशाच रितेपण मनात भरल्याचं मी पुष्कळांकडून ऐकलय पण त्या पोकळितले चंद्र, सूर्य, तारे त्यांना दिसलेच नसावेत... डबक्यातल्या त्या बदकांना स्वतःमधला राजहंस कधी कळलाच नसावा!!!
Friday, January 23, 2009
आठवण... जास्वंदाची...
त्या अलवार आठवणी डोळ्यांसमोरून अलगद तरळून गेल्या.. कवितेची शेवटची ओळ सूचत नाही म्हणून दिवसभर तळमळणार्र्यां आणि मध्यरात्री नंतर कधीतरी हवी तशी कविता कागदावर उतरली म्हणून आनंदणार्र्यौ मनाचं वेडेपण सहज हसवून गेलं... आपल्या आठवणीतच किती गोष्टी असतात... आपल्याला हसविणार्र्यां खुलाविणार्र्यां.... त्या बहरलेल्या जास्वन्दासारख्या...
..... अचानक किंचाळणारे कितीतरी हाँर्न कानावर आदळले... मनातल्या आठवणीही गोंगाटात विरून गेल्या त्या गाण्यासारख्याच... आणि मीही अभावितपणे गाडीला किक मारली... चारचौघांसारखी!!!