Friday, June 26, 2009

एक वळण अजून...

बोलवणं आलं तेव्हा मी या शहराच्या गर्दीत कुठेतरी हरवून बसलो होतो पण...
ती संवेदनाच होती अंगावर शहारे आणणारी...
देहाचा प्रत्येक कण जणू पेटून उठला!!
स्वतःच्या शरीराची जाणीव प्रचंड प्रखरतेने करून देणारी एक शिरशिरी...
उतरत गेली.. मणक्यांतून...
आणि मी बेफाम निघालो..
वाटा चुकवत, नजरा टाळत...
प्रत्येक क्षणावर लादलेलं युगायुगांच ओझं पेलत
पण हाय रे दैवा....

आज प्रत्येक लाल दिवा माझ्याकडेच वटारून बघतो आहे...
प्रत्येक खळगा आज माझ्याच गाडी खाली येतोय...
प्रत्येक गाडी आज एक रिक्षा बनून चालते आहे...
आज मी वेगात आहे की जग संथ झालंय??

रस्त्याच्या प्रत्येक हिंदोळ्यासोबत शरीराच्या रोमारोमात उठणारी आंदोलनं
निग्रहानं परतवित मी संयमाची पराकाष्ठा करतो आहे...
डोक्यावर तरंगत्या या तलवारीचा हलकासा स्पर्शही आत्मसन्मानाची होळी करणारा...

मन आणि शरीर यांच्या या अविरत द्वंद्वात मी प्राणांतिक धावतो आहे...
माझ्या ध्येयाकडे...
मनाला सतत बजावित...
या निसरड्या वाटेवर फक्त एक... फक्त एक वळण अजून...

**************************************************
(कविता वाचून विचार आला ना मनात - की ही कविता अशी कशी? तर मग जरा कल्पना करा की कालच्या पार्टीत झालेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून पोटाने बंड केलंय, तुम्ही शहराच्या मधे गर्दीत बाइक वर आहात... आणि घरी पोचून सगळ्या "शंकांच" निरसन व्हायला किमान अर्धा तास तरी अजून आहे.
- स्वानुभवावर आधारित....)


Page copy protected against web site content infringement by Copyscape

Sunday, June 14, 2009

तू आणि मी...

दोनेक वर्षांपूर्वी "तू आणि मी" म्हणून एक फॉरवर्ड सुरु होते. त्यात "तू नगारा मी ढोल, तू उथळ मी खोल" असले बरेच काही होते. त्यावरूनच सुचलेल्या या ओळी.)

तू कडा, मी घाट
तू पाऊल, मी वाट

तू काल, मी आज
तू रूप, मी साज

तू भक्ति, मी ध्यास
तू प्रीती, मी आस

तू गंध, मी धुंद
तू सर, मी चिंब

तू कोकिळ, मी तान,
तू झरा, मी तहान


Page copy protected against web site content infringement by Copyscape

Sunday, March 22, 2009

थोडा आराम करून घेईन म्हणतो...

रोजचा तोच थकवा... तीच विझलेली गात्र...
माझ्यापासून दूर कूस बदलणारी रात्र...
पहाटेच्या प्रकाशात थोडा प्राजक्त वेचून घेईन म्हणतो...
उद्या एक दिवस थोडा आराम करून घेईन म्हणतो...

पुन्हा तेच शब्द, पुन्हा तेच वाद
रंगविल्या चेहर्‍यावर पुन्हा तोच माज...
स्वतःचाही चेहरा आरशात पाहून घेईन म्हणतो
उद्या एक दिवस थोडा आराम करून घेईन म्हणतो...

अस्तित्वाच्या ओझ्याने जखडलेली मान
अन् आयुष्याच्या अंतराला दूरत्वाचे वाण
तुझ्या पदराआड थोडा निजून घेईन म्हणतो
उद्या एक दिवस थोडा आराम करून घेईन म्हणतो...

मध्यान्हिच्या ऊन्हात तळमळणारा प्राण
डोळ्यातून पाझरतेय जास्वंदाची तहान
अंगणात पुन्हा एक श्रावण शिंपून घेईन म्हणतो
उद्या एक
दिवस थोडा आराम करून घेईन म्हणतो...

आयुष्यावर एक कविता करून घेईन म्हणतो...
व्याकुळल्या श्वासात आसमंत भरून घेईन म्हणतो...
पुन्हा एकदा थोडा जगून घेईन म्हणतो...
उद्या एक दिवस थोडा आराम करून घेईन म्हणतो...

Page copy protected against web site content infringement by Copyscape

Thursday, January 29, 2009

राजहंस एकटा

काल रात्रि झोपच येत नव्हती. खिडकीतून डोकावत चंद्र माझ्या बिछान्यावर रेंगाळत होता. हळूच जाऊन खिडकित उभा राहिलो. लहानग्या बाळानं आईच्या कुशीत झोपी जावं तसच ते चांदणं जास्वन्दाच्या पानाआड पहुडलं होतं. आपल्या बाळाचा तो नाजुक पाळणा वार्र्याच्या दोरीने हलवत रात्र अंगाई गात होती. आणि खिडकित उभा राहून अनिमिष नेत्रांनी मी हा खेळ पाहत होतो. एवढ्यात....

जागते रहोsss कुणीतरी अगदी जवळून ओरडलं अणि त्या पाठोपाठ एक तीव्र कर्णकर्कश्य शिटी आली. रात्रपाळीचा एक गुरखा समोरून जात होता. माझी समाधि भंगल्याचा राग मनात जन्म घेणार त्या अगोदरच विचार आला - एवढ्या सुंदर रात्री हा असा भुतासारखा फिरतोय, एकटा...

एकटा... या शब्दानं गेले कित्येक वर्षांपासून मला कोडयात टाकली. सातवी आठवीत असताना एक पुस्तक वाचलं होतं - "तो राजहंस एकटा". ते पुस्तक कुणाचं, त्याचा विषय, आशय काहीच लक्षात नाही पण ते पुस्तक लक्षात आहे ते त्याच्या नावमुळं - "तो राजहंस एकटा"! राजहंसाच्या अनेक कथा मी लहानपणापासून ऐकत आलोय पण नीरक्षिरविवेक लाभलेला एवढा दैवी पक्षी या शीर्षकात एकटाच का असावा? तेव्हापासून एकटा या शब्दानं माझा पिच्छा पुरवलाय आणि त्या चौकिदारानं आज पुन्हा जुन्याच प्रश्नांच मोहोळ मनात उठविलं...

एवढ्यात तो पुन्हा समोरून गेला. थंडीमुळे त्याची शिटी नुसतीच फुरफुरत होती. हिवाळ्यात तीही बिचारी त्याची साथ देत नाही. मला त्याच्या दुर्दैवाची कीव आली. झोपलेल्या माणसांना जागते रहो म्हणायचं करंटेपण त्याच्या कपाळी होतं. त्याचा तो पहाडी आवाज सावधातेची सूचना आहे की या एकटेपणात त्याने स्वतःलाच घातलेली साद? जणू तो स्वतःलाच ओरडून सांगतो आहे- जग झोपलं असलं तरी तुला जागायच आहे, जागं रहायचं आहे. त्याचा हा आवाज इतरांच्या कानापर्यंत पोचत असला तरी त्याच्या स्वतःच्या मनापर्यंत पोचत असेल का?

बाहेर अमर्याद आकाश पसरलय... प्राजक्ताचा सडा पडल्यासाराखी लुकलुकणार्र्यां तार्र्यांची रास आकाशात पसरालीय... जणू रात्रीच्या अन्धारावर निगराणी ठेवण्यासाठी विधात्यानं नेमलेले पहारेकरीच!! पण त्यातला प्रत्येक जण वेगळा... एकटा...

नाही म्हणायला वसिष्ठासारखेही तारे आहेत, त्यांच्या सोबत अरुन्धती आहे. पण इतर सर्व मात्र एकटे...सगळ्यांसोबत असुनही नसलेले... त्यांचा तो एकटेपणा माणसालाही रुचला नसावा आणि त्यातूनच मग नक्षत्रांचा जन्म झाला. तार्र्यांचे समूह करण्याची कल्पना ज्याच्या कुणाच्या मनात आली त्यालाच स्वतःच्या एकटेपणाची जाणीव सर्वप्रथम झाली असावी. तारे अगोदरच होते पण नक्षत्रे आलीत ती माणसाला त्याच्या एकटेपणाची खात्री पटल्यावारच!!! आपला एकटेपणा त्यांच्याही नशिबी येऊ नये म्हणुन माणसानं नक्षत्रांची योजना केली आणि तेव्हापासून वर्षानुवर्षे तारे गुण्यागोविंदाने नान्दताहेत - एकत्र!!

राजहंसाच्या एकटेपणानं मला बुचकळ्यात टाकलं होतं, त्याला एकटेपणाचा शाप का मिळावा? पण आज कळतय तो एकटा आहे म्हणूनच "राजहंस" आहे! एकटेपणात आपण स्वतःशीच बोलायला लागतो. एकटेपणा स्वतःसोबत गप्पा मारण्याची संधि देतो. राजहंसाही असाच स्वतःसोबत बोलत असावा आणि एक दिवस तो स्वतःचाच मित्र झाला असेल.... त्यानं स्वतःला ओळखलं असेल अणि इतरांच्या सोबतीची त्याला कधी गरजच भासली नसावी...

आकाशाच रितेपण मनात भरल्याचं मी पुष्कळांकडून ऐकलय पण त्या पोकळितले चंद्र, सूर्य, तारे त्यांना दिसलेच नसावेत... डबक्यातल्या त्या बदकांना स्वतःमधला राजहंस कधी कळलाच नसावा!!!



Page copy protected against web site content infringement by Copyscape

Friday, January 23, 2009

आठवण... जास्वंदाची...

सिग्नलवर थांबलो आणि कुठून तरी एक धून कानावर पडली... शेजारच्या ऑटोरिक्शा मध्ये रेडियो सुरु होता. गाणं कुठलं होतं ते आठवत नाही पण ते संगीत मात्र मला दूर दूर कुठेतरी घेउन गेलं... वळवाच्या सरीनं मातीचा गंध पसरावा तसा भूतकाळ तरळला मनात... अणि पहिला आठवला तो अंगणातला जास्वंद आणि धो धो पावसात खिडकीत उभं राहून त्याच्याशी मारलेल्या गप्पा... आठवले ते वेडे मन... काटेकुटे तुडवत पाखरांच्या मागे धावणारे आणि चांदण्यांमधे हरवत रात्र रात्र जागणारे... आजूबाजूला कुणीही नसताना एकटेपणाचा स्पर्शही नसणारे मंतरलेले दिवस... चारचौघात कुणी ओळखत नसताना स्वतःला मात्र अचूक ओळखणारे दिवस... कितीतरी स्वप्न पाहत सारं जगच रंगविणारे दिवस... कुणाच्या तरी आठवणीत झुरणारे अन् वाऱ्याच्या झुळूकेपरी शहारणारे दिवस...

त्या अलवार आठवणी डोळ्यांसमोरून अलगद तरळून गेल्या.. कवितेची शेवटची ओळ सूचत नाही म्हणून दिवसभर तळमळणार्र्यां आणि मध्यरात्री नंतर कधीतरी हवी तशी कविता कागदावर उतरली म्हणून आनंदणार्र्यौ मनाचं वेडेपण सहज हसवून गेलं... आपल्या आठवणीतच किती गोष्टी असतात... आपल्याला हसविणार्र्यां खुलाविणार्र्यां.... त्या बहरलेल्या जास्वन्दासारख्या...

..... अचानक किंचाळणारे कितीतरी हाँर्न कानावर आदळले... मनातल्या आठवणीही गोंगाटात विरून गेल्या त्या गाण्यासारख्याच... आणि मीही अभावितपणे गाडीला किक मारली... चारचौघांसारखी!!!

Page copy protected against web site content infringement by Copyscape